सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

नेसरीचे पावन धारातीर्थ : प्रतापराव गुर्जर स्मारक-1 पावन¨खडीप्रमाणेच जिल्ह्यातील आणखीन एक स्फुर्तीदायक स्मारक म्हणजे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांचे स्मारक. गडहिंग्लजच्या सुप्रसिध्द सामानगडापासून सुमारे 20 कि.मी. अंतरावर महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाच्या परंपरेचे मानकरी, स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या बलिदानाने पवित्र झालेले धारातीर्थ आणि त्या पावन भूमीवर प्रतापराव गुर्जर यांच्या शौर्याची साक्ष देणारे स्मारक उभे आहे. इ.स. 1674 मध्ये आदिलशाही सरदार बेहलोल खानाच्या 20 हजारांच्या फौजेवर अवघ्या सहा स्वारानिशी मराठय़ांचे खुद्द सरसेनापती वेडय़ासारखे तुटून पडले. इतिहासातील एक अत्यंत विषम युध्द या परिसरात घडले. याच बेहलोल खानाला युध्दात हरवल्यानंतर सोडून दिल्याबद्दल छत्रपतींनी सेनापतींना खरमरीत पत्र लिहिले.

नेसरीचे पावन धारातीर्थ : प्रतापराव गुर्जर स्मारक-2 'गनिमास गर्दीस मिळविल्याखेरीज आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका' असे लिहिले. हे पत्र सरसेनापतींना मिळाले तेव्हा ते सहा स्वारांनिशी टेहळणीवर होते. बेभान होवून त्याचवेळी सहा स्वारानिशी प्रतापरावांनी खानाच्या हजारोंच्या सैन्यावर चाल केली व हौतात्म्य पत्करले. धन्य ते वीर, धन्य त्यांची ती स्वामीनिष्ठा, असे छत्रपतींच्या शब्दाखातर जीव ओवाळून टाकणारे वीर होते म्हणूनच स्वराज्य उभे राहिले. सात ढाली व सात तलवारी यांच्या प्रतिकृती वापरून बांधलेले हे प्रेरणादायी स्मारक. 'म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात.. या कुसुमाग्रजांच्या वीररसातील कवितेचा प्रत्यय घेत प्रत्येक शिवप्रेमींनी आवर्जून पाहावे.