सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

शंकराचार्य मठ
शुक्रवार पेठेत पंचगंगा नदीच्या घाटावर जाण्याच्या मार्गावर हा तेराव्या शतकातील प्राचीन शंकराचार्य मठ आहे. हा मठ दुमजली असून त्याच्या बांधणीमध्ये भव्यता किंवा कलाकुसर आढळून येत नाही. आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या उत्थानासाठी जे चार मठ स्थापन केले त्यापैकी एक कर्नाटकातील शृंगेरी मठ होय. या मठावर अधिष्ठित असलेल्या विद्याशंकर भारती या शंकराचार्यानी इ.स. 13 व्या शतकात कोल्हापुरात या मठाची स्थापना केली. कोल्हापुराचे 'दक्षिण काशी' म्हणून असलेले स्थान माहात्म्य व अंबाबाईचे जनमानसात असलेले स्थान पाहून त्यांना या ठिकाणी आपला मठ असावा असे वाटले. प्रारंभी हा मठ संकेश्वर मठाबरोबर संलग्न होता पण आता हा मठ 'करवीर पीठ' या नावाने स्वतंत्र आहे. कोल्हापूर मठाधीश शंकराचार्यांच्या बिरूदावलीत 'अभिनव पंचगंगातीरवास कमलानिकेतन करवीर सिंहासनाधीश्वर श्री विद्याशंकरभारती स्वामी' असा उल्लेख केला जातो.